“छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्राला स्वाभिमानाची, लढण्याची प्रेरणा देण्याच काम माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या.
पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेनाप्रमुखांच ऋण मान्य करुन बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला, देशाला समाजाला बऱ्याच गोष्टी दिल्या, ते सत्तेवर कधी आले नाहीत. म्हणजे मुख्यमंत्री, राज्यपाल कधी झाले नाहीत. ही सगळी पद सहकाऱ्यांना, सामान्य शिवसैनिकांना दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर-वीर करण्याच काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्या जयंतीदिनी गौरव केला.
“शिवसेनेचे दोन गट वेगवेगळ्या सभा वैगेर घेतायत. ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहित आहेत, जे खरोखर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना एक गोष्ट समजली पाहिजे, माननीय शिवसेनाप्रमुखांनी उभ्या आयुष्यात वेगळा गट निर्माण केला नाही. त्यामुळे गट हा शब्द चुकीचा आहे. जिथे मातोश्री आहे, तिथे शिवसेना आहे. बाजारात डुप्लीकेट औषध असतात, कपडे असतात, असा शिवसेनेच्या नावाने चायना माल बाजारात आला असेल तर तो तात्पुरता असतो. दिवाळीत चिनी फटाके येते. वात पेटते पण वाजत नाही. अशा गोष्टी भाजपाकडून निर्माण झाल्या आहेत. भाजपा स्वत: चिनी माला आहे. म्हणून ते राजकारणात चिनी मालाचा पुरवठा करत असतात” असं संजय राऊत म्हणाले.
‘अस्सल शिवसेना मातोश्रीत’
“हिंदू ह्दयसम्राटांची अस्सल शिवसेना मातोश्रीत आहे. मातोश्रीतून निर्णय होतात” असं संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलय. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “त्यांना बाळासाहेब ठाकरे माहित नाहीत. प्रतिकुल परिस्थितीत काय झुंज दिली, आम्ही अमित शाहंशी सुद्धा अशा प्रतिकुल परिस्थितीत झुंज देत आहोत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोर जी परिस्थिती निर्माण केलीय, त्या प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत आम्ही उभे आहोत. ती बाळासाहेबांची प्रेरणा आहे. महाराष्ट्रात येऊन मतांसाठी नाव घेतलं म्हणून ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
सर्वात मोठी मागणी
“अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे आवाहन आहे, हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा, ही शिवसेनेची मागणी आहे, तर तुम्ही खरे. हिंदू ह्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत भारत रत्न बद्दल काय म्हणाले?
“आज साहेबांचा जन्म दिवस आहे. शिवसेना त्यांचा वाढदिवस जोशात साजरी करत असते. साहेब आपल्यात नसले तरी विचाराने आम्ही त्यांना कायम सोबत ठेवलं आहे. साहेबांचं स्मारक उभं राहतंय. लवकरच त्याचं उद्घाटन होईल. 2026 पासून शिवसेनाप्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. ते आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या निमित्ताने आतापर्यंत शिवसेनेने अधिकृतपणे काही मागितलं नव्हतं बाळासाहेबांसाठी. महाराष्ट्र आणि देशाच्या लोकभावना आहेत. आम्हाला ती मागण्याची वेळ येऊ नये. बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न या नागरी किताबाने सन्मानित करावं. ही शिवसेनेची इच्छा नाही तर देशातील आणि जगभरातील हिंदुंची मागणी आहे. कालपासून शिवसेनेच्या ज्या संस्था आणि संघटना आहे. हिंदूंच्या संघटना आहेत, त्यांनी भारत रत्नासाठीचे ठराव मंजूर केले आहेत. 12 वर्षात ही मागणी कधी झाली नव्हती. पण आमच्या सर्व खासदारांनी संसदेत ही मागणी संसद आणि संसदेबाहेर केली आहे. विधीमंडळात केली आहे. गेल्या 12 वर्षात मोदी सरकारने मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी भारतरत्न दिलं आहे. नाव घेऊन कुणाचा अपमान करायचा नाही. पण ज्यांची राज्यात ताकद नाही, ज्यांना कोणी ओळखत नाही अशा लोकांना मोदींना भारत रत्न दिला. आम्ही त्यांचाही सन्मान करतो. पण बाळासाहेबांनी हिंदूंना अस्मिता दिली. त्यामुळेच राम मंदिर उभं राहिलं. त्यामुळे बाळासाहेबांना भारत रत्न द्या. मोदी आणि शाह यांनी ट्विटरवर आदरांजली अर्पण केली. त्यांनी आदरांजली अर्पण करण्याऐवजी त्याच ट्विटरवर शिवसेना प्रमुखांना भारत रत्न दिल्याचं जाहीर करावं”