भारताकडून पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त

0
25

भारत पाकिस्तानमध्ये अजूनही तणाव सुरूच आहे. अंधार पडताच गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तान सीमेवरील भारतीय शहरांवर हल्ले करण्यासाठी ड्रोन पाठवत आहे. भारत हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट करत आहे. पाकिस्तानची ही आगळीक पाकिस्तानलाच भारी पडली आहे. भारताने आज पहाटे पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. भारताने पाठविलेल्या ड्रोननी इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट घडविले असून रावळपिंडी एअरबेसजवळही धुराचे लोळ उठल्याचे पहायला मिळत आहेत.

भारताने पाकिस्तानवर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर सीमाभागात ब्लॅकआऊट करण्यात आले होते. ते रात्री १२ च्या सुमारास हल्ला परतवून लावल्यानंतर उठविण्यात आले. नागरिक हवी असेल तर लाईट चालू करू शकत होते. परंतू, आकाशात पुन्हा काही भागात ड्रोनच्या हालचाली दिसल्याने जालंधरसह पंजाबच्या काही भागात पुन्हा ब्लॅक आऊट करण्यात आले आहे.

पाकिस्तान सीमेपलीकडून पंजाबमधील अनेक शहरांच्या निवासी भागात हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतसरच्या उपायुक्तांनी लोकांना त्यांच्या घरातील दिवे बंद करण्याचे आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अखनूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. स्फोटांचे आणि सायरनचे आवाज ऐकू आले आहेत.

दरम्यान भारताकडून पाकिस्तानला जशासतसे प्रत्यूत्तर दिले जात आहे. पाकिस्तानच्या नरवाल, रावळपिंडीवर भारताने हल्ला केला आहे. याचे व्हिडीओ, फोटो आले आहेत. पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसवर स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे IL-78 विमान या एअरबेसवर तैनात आहेत. ज्यामध्ये हवेतून हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे.शुक्रवारी सकाळी फ्लाइट ट्रॅकिंग अॅप्सवर, एक IL-78 विमान तुर्कीहून परतताना दिसले होते.

एअरबेसवर हल्ला…

भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने शनिवारी सकाळी पाकिस्तानमध्ये घुसली होती. या विमानांनी क्षेपणास्त्रांनी तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. रावळपिंडीलगतच्या नूर खान हवाई तळाला भारताच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केले आहे. याशिवाय, मुरीद आणि सुकूर या हवाई तळांवरही भारतीय हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवला होता. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स यंत्रणेला चकवा देऊन भारताची क्षेपणास्त्रे अचूकपणे जाऊन लक्ष्यावर आदळली. हे भारताच्यादृष्टीने खूप मोठे यश मानले जात आहे. यानिमित्ताने भारतीय हवाई दल पाकिस्तानपेक्षा किती सरस आहे, हे दिसून आले आहे. याशिवाय, पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावरही काहीवेळापूर्वी मोठा स्फोट झाला आहे. तसेच भारतीय सैन्याकडून सियालकोटमधील लुनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

Spread the love