मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांचा काल (रविवारी) अयोध्या दौरा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपचे नेतेही उपस्थित होते.
या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात असताना सत्ताधारी दौरा करत असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर अयोध्येतून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत. मुख्यमंत्री सटाणा तालुक्यात दाखल राज्यात मागील दोनतीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतमालाचे मोठं नुकसान केलं आहे.
या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सटाणा तालुक्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे देखील सटाणा तालुक्यात दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसाचा तडाखा हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय.
या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, आणि पावसाचं पाणी शिरलं. दरम्यान या नुकसानाचे ना पंचनामे होतायंत ना नुकसानभरपाई मिळत आहे. अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात 6 हजार 685 हेक्टरवरील शेतीला फटका बसल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झालंय. जवळपास 12 हजार 483 शेतकर्यांचे नुकसान या अवकाळीने केलं आहे. आधीच मागील अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी हैराण असताना पुन्हा झालेल्या अवकाळीने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. तर वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली आहे.
अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, घरात पावसाचे पाणी शिरले. मालेगाव तालुक्यात ही गारपीट फळबागांना आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अकोल्यातील पातूर तालूक्यातील आस्टूल, पास्टूल गावाला पुन्हा वादळी वारा, पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. कांदा आणि लिंबू पिकाचं नुकसान झाले आहे.
महिनाभरात तब्बल चौथ्यांदा परिसराला गारपीटीचा फटका बसला आहे. धाराशिव कळंब येथे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यात गारपीट झाली. 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ही गारपीट झाली. कन्नड तालुक्यातील जेहुर अनो बोलठान या गावची ही दृश्य आहेत. इतर गावातही मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे.