जळगाव – मूळ फैजाबाद (उत्तरप्रदेश) येथील रहिवासी आणि सेवानिवृत्तीनंतर डोंबिवलीत स्थायिक रामचंद्र राजबहादुर सिंह (वय ६४) जळगाव रेल्वेस्थानकावर धावत्या रेल्वेगाडीतून बेपत्ता झालेत.
लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पूजा रामचंद्र सिंह (वय ३३, रा. ठाणे) यांनी लोहमार्ग पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील १० ऑक्टोबरला शुभम माझी या तरुणासोबत साकेत एक्सप्रेसने प्रवास करत होते.
साकेतच्या एस-६ बोगीच्या बर्थ क्रमांक २०-२१ वर दोघांचे ‘रिझर्वेशन’ तिकीट असल्याने दोघांचा आरामात प्रवास सुरू होता. ११ ऑक्टोबरला भुसावळ रेल्वेस्थानकात देाघांनी नाश्ता घेतला.
नाश्ता आटोपून दोघे बर्थवर पडून असताना भुसावळ रेल्वेस्थानक सोडल्यानंतर मुंबईच्या दिशेने रेल्वे निघाली असताना श्री. सिंह हे बाथरूमला जाण्यासाठी उठले. तेव्हा रेल्वे जळगाव रेल्वेस्थानका दरम्यान, असताना श्री. सिंह बेपत्ता झाल्याचे शुभमने कुटुंबीयांना कळवले.
गेली आठ दिवस हे कुटुंबीय कल्याण ते भुसावळ या भागात श्री. सिंह यांचा शोध घेत होते. सहाय्यक उपनिरीक्षक रामराव इंगळे हे तपास करत आहेत.










