जळगावकरांचे अनोखे आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यांना हळद-कुंकू वाहिले, ‘आरतीही’ उतरवली!

0
33

जळगाव – जळगावातले खड्डे जीवघेणे झालेत, अपघात घडून येत आहेत. वाहनचालक हैराण झालेत. तरीही, महापालिका खड्डे बुजवायचे नाव घेत नाही. या महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडावे म्हणून जळगावकरांनी खड्ड्यांची पूजा करीत आरतीच केली.

लोकांनीच रस्त्यावर उतरून असे आगळे-वेगळे आंदोलन केल्याने जळगावात या आंदोलनाची चर्चा होत आहे. एवढं करूनही महापालिकेला शहाणपण सुचणार का? आणि खड्डे बुजणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
जळगावमधील रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या मोठी आहे. राज्य सरकारकडून खड्डे रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी शंभर कोटीचा निधी दिला आहे. आमदारांनी हा निधी आणल्याचा दावा केला. ही कामे महापालिकेद्वारे न करता राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत.

या विभाामार्फत शहरात कामे करतांना महापालिकेला कोणतीही माहीत दिली जात नसल्याचा आरोप महापालिका करीत आहे. तर महापालिका कामासाठी ना हरकत देत नसल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे करीत आहेत, या राजकीय वादामध्ये जळगावातल्या रस्त्याची कामे रखडली आहेत.

राजकारण्यांच्या कुरघोडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे आता रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी जनताही रस्त्यावर उतरली आहे. जळगावातील नागरिक भरत कर्डिले यांच्या नेतृत्वाखलील युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच्या खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून, हळद कुंकू वाहून अनोखे आंदोलन करीत रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे, जर ताबडतोब काम झाले नाही तर हजारो नागरिकांना घेऊन आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Spread the love