जळगाव – गेल्या रविवारी अजित पवार यांनी राज्यात नवीन भूकंप घडवून आला. त्यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि या सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर इतर आठ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यांनंतर पहिल्यांदाच ना.अनिल पाटील हे आज सकाळी रेल्वेनं जळगावात दाखल झाले. यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. जळगावात दाखल होताच त्यांनी मोठा दावा केला आहे.
वाट बघा सध्या आम्ही ४४ प्लस आहोत. काही दिवसांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमच्याकडे असेल; असा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीमधून अजित पवार गट बाहेर पडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या ५३ पैकी किती आमदारांचा पाठिंबा अजित पवार गटाला आहे. याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यातच मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केलेले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत अनिल पाटील अमळनेर मतदारसंघातून निवडून येत पहिल्यांदाच आमदार झाले आणि कॅबिनेट मंत्रिपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. मंत्री झाल्यानंतर अनिल पाटील हे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याने अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांचं जळगाव स्टेशनवर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले.












