जळगाव -: गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण वाढले असुन त्याच्यावर अंकुर म्हणुन जळगाव एसीबीचे लावण्यात येत असलेले सापळे यशस्वी होत असल्याने थोड्या प्रमाणात का होईना परंतु लाचखोरीला आळा बसत आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी जळगाव मनपातील लाचखोर लिपिकासह एकाला ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतांना आता अटक वॉरंट प्रकरणी एका आरोपीला अटक न करता वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. ही कारवाई भुसावळ परिसरात करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला गुन्हेगारी प्रकरणी अटक वॉरंट आले होते. हे वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. एसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.