काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्य सरकारने परवानगी नाकारल्या नंतरही राहुल गांधी लखीमपूर खेरीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. रविवारी लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंसाचार झाल्यानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना लखीमपूर खेरीमध्ये जाण्यास योगी रोखण्यात आलं होतं.
काँग्रेसने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लखीमपूर खेरी संदर्भात एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात म्हटले होते की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने जिल्हा दौऱ्याची योजना आखली आहे. तसेच प्रियंका गांधी यांची अटक कोणत्याही कारणाशिवाय असल्याचं म्हटलं होतं. राहुल गांधी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे शिष्टमंडळ दुपारी दीडच्या सुमारास राज्याची राजधानी लखनऊला पोहोचणार आहे. राज्य सरकारने मोठ्या संमेलनांवर बंदी घालण्याच्या आदेशांचा हवाला देऊन लगेचच भेटीची परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती एएनआयने दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटकेनंतर सीतापूरमधील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलंय. तर, दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रियंका गांधींच्या अटकेला विरोध केला. तसेच जर कायदा सर्वांसाठी समान असेल तर प्रियंका गांधी तुरुंगात का आहेत आणि मंत्री मोकळे का फिरत आहेत, असा सवाल त्यांनी केला होता.











