रावेरात एकतेचा संदेश; गणेश विसर्जन मिरवणुकीवर केली फुलांची उधळण

0
52

रावेर -शहरात घडलेल्या अनेक दंगलीने रावेरचे नांव बदनाम केले आहे. हा कलंक रावेरच्या प्रगतीला बाधक ठरला, आता शहरवासीयांकडून शहरात शांतता नांदावी यासाठी प्रचंड काळजी घेतली जात असतांना, यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक घडली.चक्क ज्या धर्म स्थळापुढे दोन वर्षांपूर्वी दंगल घडली होती,त्याच ठिकाणी मौलाना व मुस्लिम बांधवानी गणेश विसर्जन मिरवणुकीवर फुलांची उधळण केली,कार्यकर्त्यांना फुले देऊन स्वागत केले.या कृतीने बदलत्या रावेरचा नवा अध्याय सुरू केल्याचे प्रतिबिंब समाजात उमटले आहे.

येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात 103 वर्ष जुन्या कृषक समाज सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक मण्यार वाड्यातील मास्जिदी समोरून जात असतांना, विश्वस्त मौलाना रफिक भाई मुतवल्ली, मोहम्मद अकबर शेख, इलियास शेख, हाजी गुलाम शेख, खलील शेख, मुस्ताक हुसेन शेख, शफीउद्दीन शेख, शफी खान मोहम्मद खान या मुस्लिम कार्यकर्त्यांनी प्रार्थना स्थळावरून गणरायावर आणि सोबतच्या गणेश भक्तांवर पुष्पवृष्टी केली.एडवोकेट एल के शिंदे, राजेश शिंदे, प्रशांत दाणी, अनिल महाजन, सुभाष महाजन, भावलाल महाजन, नगरसेवक सुधीर पाटील, गोपाळ शिंदे, श्याम शिंदे या कार्यकर्त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रभारी विभागीय पोलीस अधिकारी विवेक लवांड, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक, गोपनीय विभागाचे विठ्ठल देशमुख, राजेंद्र करोडपती, विजय जावरे उपस्थित होते.

21 मार्च 2020 रोजी पुकारलेल्या जनता कर्फ्युच्या समारोपप्रसंगी दोन गटात वाद होऊन, या चौकातील आवजी सिद्ध महाराज मंदिरासमोर आणि प्रार्थनास्थळासमोर जातीय दंगली, दगडफेक आणि जाळपोळ झाली होती.या घटनेचे परिणाम संपूर्ण शहाराला भोगावे लागले,यंदा मात्र मैत्री आणि सौहार्दचा नवा अध्याय सुरू झाला,याचे भरभरून कौतुक होत आहे.शहरातील दंगली हिंदू मुस्लिम समाजाला घातक ठरल्याने,मोठे नुकसान झाल्याचे सर्व शहर वासीयांच्या लक्षात आले आहे.त्याची पुररावृत्ती न होता,दोन्ही समाजात मैत्रीचे संबंध दृढ व्हावेत या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न होत असल्याने रावेर आता विकासआणि शांततेचे प्रतीक बनून दंगलीचे डाग पुसून काढण्यासाठी सज्ज झाले आहे.

Spread the love