धाराशिव – : धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने शेतातील पिके हिरावली आहेत. तर अनेकांचे शेत वाहून गेले आहे. या भयानक पावसात जनावरे देखील मेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. पण भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात वेगळा प्रकार बघायला मिळाला. या गावात शेकडो जनावरे वाहून गेले आहेत. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन गावात पाहणीसाठी आल्यानंतर शेतकरी उद्विग्न झाले.
चिंचपूर ढगे गावच्या शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा थांबवला. यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले. जनावर मेली आहेत. तात्काळ मदत द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ‘मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो. मी पैसे घेऊन आलो नाही’, असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे जाणे पसंत केले.
मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना सांगितले की, हा मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मदतीबाबत ठरवतील. नुकसान खूप मोठे आहे. याची जाणीव आहे. मी दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसोबत बोलत आहे. मी दौऱ्यावरच आहे. काल रात्री बीडला होतो. काल जळगावला होतो, आज धाराशिवला आलो आहे. पुढे सोलापूरलाही जातोय, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
योग्य निर्णय घेतला जाईल
मी मुख्यमंत्र्यांसोबत सर्व चर्चा केलेली आहे. सरकार योग्य निर्णय घेतील. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्थिती आहे. जिथे ओला दुष्काळ होता तिथे ओला दुष्काळ जाहीर केला जाईल. आवश्यक असेल त्या ठिकाणी आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू. ओला दुष्काळ जिथे असेल तर त्याबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली