भाजपा,शिवसेनेतर्फे ३० मार्च पासून राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांची माहिती

0
39

 

जळगाव – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिले.राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आ. सुरेश भोळे(राजूमामा) यांनी नमूद केले.या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री श्री. विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस श्री.संजय उपाध्याय तसेच उत्तर महाराष्ट्र • महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीषभाऊ महाजन, आ.जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री श्री. विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे(राजूमामा), श्री. दिपक सुर्यवंशी, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील, आ. संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, श्री.पी.सी. आबा पाटील, श्री. नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, श्री.के.बी.पाटील, श्री. राकेश पाटील, श्री. सचीन पानपाटील, श्री. हर्षल पाटील, श्री. मधुकर काटे, श्री विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, श्री. महेश जोशी, श्री. नितीन इंगळे, श्री. राहुल वाघ, श्री. जयेश भावसार, श्री.श्रीकांत महाजन, श्री. आनंद सपकाळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्व हा विषय देशाच्या एकूण राजकारणाचा केंद्रबिंदू झाला असल्याने प्रखर हिंदुत्व मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सतत अपमानित करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होत आहे. अंदमानातील काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहून त्यांची माफी मागितली असे घाणेरडे आरोप करून सावरकरांना माफी वीर म्हणून बदनाम केले जात आहे, परंतु अशा फुटकळ आरोपांनी सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व डागाळले जाणार नाही. सावरकर म्हणजे सूर्य त्याचे तेज तळपत राहणारच. स्वा. सावरकर साहित्याचे अभ्यासक व्याख्याते आणि सावरकर अध्यासनाचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी सावरकरांवर होत असलेल्या आरोपांना दिलेले सडेतोड उत्तर दिले आहेच.

Spread the love