भुसावळ -: वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी 73 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी, कोतवाल आणि पंटर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही धडक कारवाई सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी दुपारी यावल नाका परिसरात करण्यात आली.
मागणी ८० हजारांची, तडजोडीत ७३ हजार रुपये घेतले
तक्रारदाराकडून तहसीलदार नीता लबडे यांच्या नावाने प्रथम ८० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ७३ हजार रुपये ठरले आणि ही रक्कम स्वीकारताना तिघांनाही अटक करण्यात आली. वराडसीमचे तलाठी नितीन पंडितराव केले, कठोऱ्याचे कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव आणि तिघ्रे (साकेगाव) येथील खाजगी पंटर शिवदास लटकन कोळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ACBचा सापळा, डीसपी योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
तक्रारीनंतर ACB जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. तक्रारदाराला वाळूचे वाहन सुरळीत चालवायचे होते, मात्र अधिकाऱ्यांनी त्याला गैरमार्गाने पैसे देण्यास भाग पाडले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे ७३ हजारांची रक्कम देताना हे तिघे पकडले गेले.
महसूल विभागात खळबळ
जिल्ह्यात सध्या वाळू वाहतुकीवर बंदी असतानाही, उच्च अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून ही वाहतूक सुरू ठेवली जात असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. त्यासाठी लाच मागून भ्रष्टाचार करण्यात येत होता, हेही स्पष्ट झाले. या कारवाईने भुसावळ तहसील कार्यालय आणि महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, इतर संबंधितांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.