जळगाव -जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. चोपड्यातील गजबजलेल्या भागात ब्रेक फेल झाल्याने एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे.
रवींद्र बहारे (वय 40) व सोनू रशीद पठाण (वय 22) यांचा या अपघातात मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरात स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटी (क्र MH 40, N9828) या बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली. ही बस लासूरकडून चोपडा आगारात येत असल्याची माहिती आहे. मात्र शहरातील गजबजलेल्या भागात भरधाव ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. यात रवींद्र बहारे आणि सोनू रशीद पठाण हे दोघे ठार झाले.
तर या अपघातात अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून आमदार चंद्रकांत सोनवणे डॉक्टरांना तातडीने उपचाराचे निर्देश दिले असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.