२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

0
52

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा दिला गेला व त्या करिता दलीत मुस्लिम कार्ड खेळले गेले तर भाजपा ने चारसो पार हा नारा दिला व त्या करिता हिंदुत्वाचे कार्ड खेळले. मात्र या निवडणुकीत संविधान व हिंदुत्व हे मुद्ये कोठेच दिसत नाही असे परखड विचार प्रसिध्द साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.

साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे २३ जून रोजी प्रागतिक समविचारी संघटना – संस्था समन्वय मंच च्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय बैठकीत मार्गदर्शन करताना वाघ बोलत होते. अध्यक्षस्थानी संयोजक तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश अध्यक्ष अविनाश पाटील होते. पनवेल येथील प्रसिद्ध समाजवादी नेत्या उल्का महाजन या मुख्य अतिथी म्हणून हजर होत्या. जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक येथील सुमारे पन्नास संघटना, संस्था यात सहभागी झाल्या होत्या.

जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की महाराष्ट्रात भाजपाने शरद पवार यांचे राजकीय प्राबल्य संपविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. मराठा समाजाचे राजकीय प्राबल्य संपविण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा वापर सुरू केला व मराठा समाज जागृत झाला व तो पूर्ण ताकदीने शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून शरद पवारांच्या पक्षाला ८० टक्ये जागा मिळाल्या. एकट्या मराठा समाजाचे २६ खासदार निवडून आले. महाराष्ट्रात भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडला नसता, शिवसेना फोडून शिंदे यांना मुख्यमंत्री केले नसते तर महाराष्ट्रात त्याला किमान चाळीस जागा मिळाल्या असत्या. भाजपाचे मराठा विरोधी रणनीती ओळखली नसती तर मराठा समाज निम्या प्रमाणात राजकारणाच्या बाहेर फेकला गेला असता. असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले, संयोजक अविनाश पाटील यांनी कार्यक्रमाची एकूण भूमिका व आगामी विधानसभा निवडणूक या विषयी सविस्तर मांडणी करून काँग्रेस लोकसभेच्या वेळेस बरीच उदास राहिली तिने तिचे उदासिकरण नाही सोडले तर या पक्षास मोठा फटका बसू शकतो असे विचार व्यक्त केले. खलील देशमुख, सतीश सुर्वे , फाईम पटेल, शाम पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास कार्यकर्ते मोठ्यासंख्येने हजर होते.

Spread the love