अमळनेरसाठी 197 कोटींची पाणी योजना मंजूर! पाडळसरे धरणावरून मिळणार लाभ; शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार

0
52

अमळनेर – शहरासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या २४ बाय ७ या नगरपरिषदेच्या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पास नगरोत्थान योजनेंतर्गत राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून, याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (ता.१३) प्रसिद्ध झाला.

नवीन पाणीपुरवठा योजना पाडळसरे धरणावरून असून, सुमारे १९७ कोटी २२ लाख ५२ हजार निधीतून पूर्णत्वास येणार आहे. धरणावरून उचललेले पाणी शहरातील ढेकू रोडवरील बांधकाम विभागाजवळील नवनाथ टेकडीवरील नव्याने होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन तेथून शहरातील जलकुंभामध्ये वितरित होणार आहे.

विशेष म्हणजे, या योजनेत पाणी उचल केंद्र असलेल्या धरणावर आणि जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या नवनाथ टेकडीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने पालिकेचे मोठ्या प्रमाणात वीजबिलही वाचून अमळनेरकरांची वर्षभर तहान भागविण्यासाठी पाणी उपलब्ध असणार आहे.

यात विशेष बाब म्हणजे धरणावरून पाणी उचलण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून ९.१४ दलघमी एवढे पाणी आरक्षित करण्यासाठी मंजुरीही घेण्यात आली असून, शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार लक्षात घेता ही मंजुरी घेतली गेली असून, २०५६ पर्यंत हे आरक्षण असणार आहे.

मुख्याधिकारी तुषार नेरकर, पाणीपुरवठा अभियंता प्रविणकुमार बैसाणे तसेच जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन सर्वेक्षण केले आणि पाडळसरे धरणातून यंत्रणा अंतिम केली. २७ जून २०२४ ला तांत्रिक मान्यता मिळाली तर धरणावरून पाणी आरक्षणासाठी १० जुलैला तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून पाणी आरक्षण मंजुरी मिळाली.

या आधी शहरासाठी १९७१ मध्ये तापी नदीवरील जळोद डोहातून पाणी योजना कार्यान्वित झाली, याचे जलशुद्धीकरण केंद्र गांधली येथे होते. प्रत्यक्षात तापी नदीचा डोह खाली व जॅकवेल उंचावर यामुळे एकप्रकारे एक तांत्रिक दोष या योजनेत आहे. तसेच उन्हाळ्यात हा डोह आटत असल्याने आवर्तन विकत घ्यावे लागते.

Spread the love