वसई -: राज्यात हिन्दी-मराठी भाषेवरून वाद सुरू असताना विरारमध्ये नव्यानं एक वाद उफाळून आला आहे. यात मराठी भाषेवरून एका रिक्षाचालकाच्या मुजोरीचा हा प्रकार समोर आला आहे. ‘हिंदी बोलेगा, भोजपुरी बोलेगा, मगर मराठी नहीं बोलेगा!’
असे मुजोरीने म्हणणाऱ्या एका रिक्षाचालकाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि त्याचे पडसाद अखेर रस्त्यावर उमटले.
हिंदी बोलूंगा, तुझे क्या करना है?
ही घटना शनिवारी सायंकाळी विरार स्टेशन परिसरात घडली. चार दिवसांपूर्वी या रिक्षाचालकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो मराठी भाषा बोलण्यास स्पष्ट नकार देत ‘हिंदी बोलूंगा, तुझे क्या करना है?’ अशा उद्धट शैलीत मराठी भाषेला दूषणे देत होता. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि मराठीप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. परिणामी शनिवारी, या रिक्षाचालकाला ओळखून शिवसेना (उबठा) कार्यकर्त्यांनी त्याला स्टेशन परिसरातच पकडले. संतप्त शिवसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि त्याच्याकडून सार्वजनिक ठिकाणी हात जोडून ‘मी मराठी माणसांची माफी मागतो, महाराष्ट्राची माफी मागतो’ असे म्हणवून घेतलं.
मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये चर्चा सुरू झाली असून काहींनी याचे समर्थन केले आहे. तर काहींनी कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची अधिकृत नोंद झालेली नाही. मात्र मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत शिवसैनिकांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरला आहे.
मराठी शिकण्यासाठी मोफत वर्ग; भाजपचे मुंबईचे प्रवक्ते यांची अभिनव संकल्पना
भारतीय जनता पार्टी मुंबईचे प्रवक्ते आणि हिंदी साहित्य भारती महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दयानंद तिवारी यांनी जाहीर केले आहे की, ते मराठी भाषा शिकवण्यासाठी मोफत वर्ग सुरु करीत आहेत. महाराष्ट्राच्या भाषिक व सांस्कृतिक एकतेला बळकटी देण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पावले आहे. ‘मराठी ही महाराष्ट्राची आत्मा आहे, आणि हिंदी ही तिची आत्मीय बहीण. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृतीचे सेतू आहे. आमचा उद्देश या सेतूला मजबुती देणे आहे, खंडित करणे नव्हे.’ असे प्रा. तिवारी म्हणाले. या वर्गांमध्ये मराठी भाषा सहज, व्यवहार्य व संवादात्मक पद्धतीने शिकवली जाईल, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तीसही आत्मविश्वासाने मराठीत संवाद साधता येईल. असेही ते म्हणाले.