जळगाव महाराष्ट्रतील प्रसिद्ध राजमल लखीचंद अर्थात आर. एल. समूहाच्या विविध आस्थापनांवर ईडी (ED) आणि आयकर विभागाकडून (IT) एकाचवेळी छापेमारी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई,नागपूर आणि संभाजीनगर इथून ईडी पथकाच्या दहा गाड्या गुरुवारी एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिक मधील एकूण सहा कंपन्यांवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी करत त्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली.
स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्जावरुन सीबीआयने गुन्हा दाखल केला होता त्यानंतर ईडी कडून ही कारवाई करण्यात आली आहे. यात राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पण त्यात काहीही राजकीय हस्तक्षेप नसल्याचे आर एल समूहाचे ईश्वरलाल जैन यांनी सांगितले आहे. तसंच त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात काहीही दम नाही. मात्र काही गोष्टी नीट व्हायला वेळ लागतो अशी प्रतिक्रिया ईश्वरलाल जैन यांनी दिली आहे












