प्रतिनिधी जितेंद्र काटे
भुसावळ | तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरे येथे शेतात पेरणी करीत असताना विज खांबात असलेल्या विजेच्या धक्क्याने बैल ठार झाल्याची घटना घडली.
या बाबत माहिती अशी की , गोजोरा – कुऱ्हा पानाचे रस्त्याला लागून गोजोरे शिवारात गट नंबर १६७ हे ज्ञानेश्वर एकनाथ तळेले यांचे शेत आहे.या शेतात दि.२८ जून रोजी सकाळी ९:३० वाजेला पेरणी करीत असताना शेतात असलेल्या लोखंडी विज खांबा जवळ पेरणीचे औत आले असता आधीच पाऊस पडल्याने शेत ओले होते आणि विज खांबातून विज प्रवाह जमिनीत उतरलेला असल्याने एका बैलाला विजेचा धक्का बसल्याने अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचा बैल जागीच ठार झाला आणि दुसरा बैल शेतकरी ज्ञानेश्वर तळेले व सोबत असलेल्या चेतन तळेले यांनी पायात चप्पल घालून सोडवल्याने दुसरा बैल वाचला. वास्तविक पाहता पेरणीचे औत लोखंडी होते मात्र दुसर लाकडी असल्याने पेरणी करणारे ज्ञानेश्वर तळेले , वंदना ज्ञानेश्वर तळेले, सरला गोपाळ तळेले, चेतन तळेले , यांंचा जिव वाचला अन्यथा मोठी अपघाती घटना घडली असती असे बोलले जात आहे.
घटना घडल्यानंतर गावातील पोलीस पाटील , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. विज वितरण कंपनीचे अभियंता नयन गावंडे,व कर्मचारी भैय्या जंगम , मनोज चौधरी , पंकज जंगले यांनी घटनास्थळी धाव घेऊन विजपुरवठा खंडीत केला व विज खांब तसेच विज तारांची पाहणी केली असता दोन विज खांबातून विज प्रवाह जमिनीत उतरल्याचे पोलीसां समोर सांगितले.या नंतर शेतमालक ज्ञानेश्वर तळेले यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दाखल केली असता कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी विकास बाविस्कर व सचिन पारधी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे तसेच पशू वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश राणे यांनी मृत बैलाचे शवविच्छेदन केले आहे. ऐन पेरणीच्या काळात बैल ठार झाल्याने लवकरात लवकर विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात असून परिसरातील शेती शिवारातील विज खांबा मधील विज प्रवाहाची तपासणी करण्यात यावी अशी मागणी पोलीस पाटील विनोद सपकाळे , सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी , भागवत कोळी , धनराज वाघ व गावातील शेतकऱ्यांनी केली असून घटनेचा तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ विकास बाविस्कर करीत आहेत . लवकरात लवकर विज वितरण कंपनी ने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिला शेतकरी सौ. वंदना ज्ञानेश्वर तळेले यांनी केली असून पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात तुटलेल्या विज तारा तसेच लोखंडी विज खांब व सिमेंट विज खांबातून गेलेल्या विज आर्थिक तारा यांना हात लावू नये तसेच संशयास्पद वाटल्यास विज वितरण कंपनीच्या अधिकारी व विज कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विज वितरण कंपनीचे अभियंता नयन गावंडे यांनी सांगितले आहे.












