अध्यक्ष अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतात; राहुल नार्वेकर

0
41

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज (ता.११) येईल. आपण राज्यघटनेच्या तरतुदींनुसार आणि एक जबाबदार नागरिक म्हणून न्यायालयाच्या निकालाचा मान राखायला पाहिजे, त्याने दिलेल्या निकालाचे स्वागत करून तो मान्य करायला पाहिजे.” असे आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केले.

तसेच आमदार अपात्रतेचा निर्णय केवळ विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात असा दावाही नार्वेकर यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांनी जर घटनाबाह्य निर्णय घेतला तरच सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येतो, असेही ते म्हणाले. नार्वेकर पुढे म्हणाले की, ” शिवसेनेत फूट पडल्यानंतर चिन्ह आणि नावासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करण्यात आली. परंतु न्यायालयाने कोणताही हस्तक्षेप न करता निवडणूक आयोगच निर्णय घेईल असे सांगितले.

तो निर्णय चुकला असेल तर तुम्ही आमच्याकडे दाद मागा, असेही कोर्टाने म्हटले होते. विधानसभा अध्यक्ष जेव्हा याचिकांवर निर्णय देतील तो निर्णय जर घटनाबाह्य असेल किंवा नियमबाह्य असेल तर कलम २२६ आणि ३२ च्या आधारे सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. परंतु जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय देत नाहीत तोपर्यंत कोणतीही घटनात्मक संस्था यात हस्तक्षेप करणार नाही.”ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही नार्वेकर यांनी सुनावले. राऊतांच्या टीकेला कुणीही महत्त्व देत नाही त्यांचा कायद्याचा अभ्यास कच्चा आहे. राऊत यांच्या टीकेची लोक किती दखल घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. ते राज्यघटनेच्या तरतुदींची माहिती न घेता वक्तव्ये करत आहेत.

त्यांनी कलम १८० वाचावे त्यात स्पष्ट तरतूद आहे की विधानसभा अध्यक्षांचे कार्यालय जेव्हा रिक्त असते किंवा विधानसभा अध्यक्ष कार्यरत नसतात त्यावेळी केवळ विधानसभा उपाध्यक्षांकडे सगळे अधिकार जातात. पण जेव्हा विधानसभा अध्यक्ष पदावर येतात, किंवा कार्यरत असतात त्यावेळी उपाध्यक्षांकडे दिलेले अधिकार संपुष्टात येतात आणि अधिकार पुन्हा अध्यक्षांकडे येतात. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय केवळ विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात, असे ते म्हणाले.

Spread the love