जळगाव -: राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला सोडण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांचे उमेदवारीचे तिकीट जवळपास अंतिम झाल्याचे सूत्रांकडून समजते.आज प्रताप पाटील यांनी निवडणुकीचा अर्ज देखील घेतल्याने त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. आता फक्त शिवसेना पक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्रताप पाटील हे केवळ राजकीय वारसा लाभलेले नेतृत्व नसून स्वतःच्या कार्यशैलीतून जनतेमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क असल्याने ते लोकांमध्ये सहज मिसळणारे आणि प्रत्येकाच्या अडचणीला तत्काळ प्रतिसाद देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. बारा महिने 24 तास जनतेसाठी उपलब्ध राहण्याची त्यांची कार्यपद्धती कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाकडे भविष्यातील प्रभावी राजकीय चेहरा म्हणून पाहिले जात आहे.
संघटन कौशल्य, शांत स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि निर्णयक्षम नेतृत्व ही प्रताप पाटील यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. युवा वर्गामध्ये त्यांची वाढती लोकप्रियता आणि महायुतीतील विविध घटक पक्षांशी असलेला समन्वय यामुळे त्यांची उमेदवारी अधिक मजबूत मानली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुभव, जनसंपर्काची मजबूत पकड आणि मतदारसंघातील सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने असलेली उपस्थिती यामुळे प्रताप पाटील यांनी अल्पावधीतच स्वतःचा स्वतंत्र राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत ते महायुतीसाठी सक्षम आणि विजयी चेहरा ठरू शकतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून जळगावच्या राजकीय वर्तुळात आता अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











