हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आग्रहाखातर राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहिले.
त्याद्वारे शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन करून पालकमंत्री देसाई यांची विधानसभेसाठीची खुंटी बळकट केली आहे. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ दौलतनगर (ता. पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अनिल बाबर, शहाजी पाटील, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर, रविराज देसाई,
आदित्यराज देसाई आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी तब्बल महिन्याहून अधिक काळ मेहनत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. त्याचबरोबर अभियानाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित केला होता. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार केले. या अभियानांतर्गत तब्बल २५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यात पाटण तालुक्यातील बहुतांश लाभार्थ्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यातील जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पाटणच्या दऱ्याखोऱ्यातील डोंगरकपारातील नागरिक महिला यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. मुख्यमंत्री दौलतनगरला येण्यासाठी मुंबईहून हेलिकॉप्टरने रवाना झाले. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईत उतरावे लागले. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याबाबतची कल्पना पालकमंत्री देसाई यांना दिली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी दुसऱ्या हेलिकॉप्टरने तब्बल तीन तास उशीर होऊनही दौलतनगर गाठलेच.
पालकमंत्री देसाई यांच्या आवाहनानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते मुख्यमंत्री येईपर्यंत ते मंडपामध्ये बसून होते. तब्बल तीन तास मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याला उशीर होऊनही कार्यकर्ते जागचे हलले नाहीत. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री जिल्ह्यात पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जल्लोषात तयारी केली होती. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.
मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी आल्यानंतर गर्दीत पुन्हा वाढ झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री देसाई यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांना ताकद दाखवून दिली. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विधानसभा निवडणुकीची पायाभरणीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री देसाई यांनी केली. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून त्यांनी कार्यकर्ते, महिला यांना उपस्थित ठेवून जोरदार शक्तीप्रदर्शन करत विधानसभेसाठीची खुंटी बळकट केल्याचे बोलले जात आहे.
विश्वास दुणावला…
पाटण बाजार समितीत पालकमंत्री देसाई यांनी ऐतिहासिक सत्तांतर घडवत विरोधी पाटणकर गटाला जोरदार धक्का दिला. पाटण विधानसभा मतदारसंघात शासनाच्या निधीतून त्यांच्या माध्यमातून झालेली गावोगावची विकासकामे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर घातलेले लक्ष आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना दिलेली उमेदवारी यामुळे त्यांना बाजार समितीची सत्ता हस्तगत करता आली. बाजार समितीच्या विजयामुळे पालकमंत्री देसाई गटाचा विश्वास दुणावला आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही तोच ट्रेंड कायम राखण्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखली आहे.











