कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरीत करण्यात आलेल्या आठ चित्त्यांपैकी चार चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात चौघांचे बळी गेले आहेत. यामध्ये मादी चित्ता ज्वालाच्या पिल्लाचा तिचा देखील समावेश असून आता विविध स्तरांतून टिका होऊ लागली आहे. भाजप मात्र या प्रकरणी चकार शब्द काढतांना दिसत नाही. अशातच आता तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
आपल्या ट्विटर हँडलवरून साकेत गोखले यांनी अत्यंत कठोर शब्दात चित्त्यांची स्थिती आणि पंतप्रधान मोदींपुढे भाजपची हतबलता मांडली आहे. मोदींच्या हट्टापायी या चित्त्यांचा बळी गेल्याचंही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.
‘गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मोदी सरकारने नामिबियातून 8 चित्ते आणले होते आणि त्यांना पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे चित्ता ही संकटात सापडलेली प्रजाती आहे. आणि जगात केवळ 7000 चित्ते शिल्लक आहेत. गेल्या 2 महिन्यांत यापैकी चार चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन दिवसांपूर्वी मरण पावलेल्या चित्त्याचाही समावेश आहे. केवळ पंतप्रधान मोदींचं समाधान करण्यासाठी भाजपने निष्पाप धोक्यात असलेल्या प्राण्यांचे लज्जास्पदपणे बळी दिले आहेत’, असं गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.











