देशात लोकसभा निवडणूकची तयारी सर्व राजकीय पक्षांकडून सुरू आहे. लोकसभेच्या जागावाटपावरूवन शिंदे गट आणि भाजप यांच्या रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाची जाहिरात आज, १३ जून रोजी महाराष्ट्रीतील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये झळकली आहे.
या जाहिरातीवरून वातावरण तापताना दिसत आहे.
या जाहिरातीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा तीन टक्के जास्त लोकांची पसंती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीवर उध्दव ठाकरे गटाकडून टिकास्त्र सोडण्यात आलं आहे.
“हा सर्व्हे नक्की कुठे केला. हा महाराष्ट्रातील सर्व्हे असेल असे वाटत नाही, मुख्यमंत्री दोन तीन सरकारी बंगल्यात राहतात तिथे त्यांनी हा सर्व्हे केला असावा किंवा गुजरातमध्ये केला असावा” अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सर्व्हे खरा की खोटा यात आम्हाला पडायचं नाही कोणाला आनंद घ्यायाचा असेल तर घ्यावा असेही राऊत म्हणाले आहेत.
बाळासाहेब ठाकरेंना विसरलात?
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या जाहिरातीत पंतप्रधान मोदींचा फोटो देण्यात आला, मात्र बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे दिसत नाही. म्हणजे ही सेना कोणाची आहे? ही मोदी सेना आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त मान्यता मिळाली याचा तु्म्हाला इतका मोठा आनंद झाला आणि या आनंदाच्या क्षणात बाळासाहेबांना विसरलात? कोट्यवधींच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा साधा उल्लेख देखील नाही. म्हणजे ही शिवसेना शिवसेना नसून मोदी-शाहांची सेना आहे हे आज स्पष्ट झालं आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
जाहिरातीत काय म्हटलंय?
राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळालं आहे.
मतदान सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला ३०.२ टक्के टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्केजनतेने कौल दिला. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणासाठी इच्छुक आहे.
या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार, असे जाहिरातीमध्ये म्हटले आहे.











