जळगाव – शहरासह जिल्ह्यात शुक्रवार (ता. २१)पासून सुरू असलेल्या पावसाची संततधार दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २२)ही सुरूच होती.
पावसामुळे हतनूरच्या जलाशयात मोठी वाढ झाली असून, धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडले आहेत.
यामुळे तापी नदीला पूर आला आहे.
पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावांत पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाच्या रिपरिपीने जनजीवन विस्कळित झाले आहे. नद्या, नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात पूर येऊन अनेक घरांत पाणी शिरले.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात एकूण १८ दिवस पावसाने हजेरी लावली. त्यात १९९.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या बुधवार (ता. १९)पासून पावसाचा जोर कायम आहे.
गुरुवारी (ता. २०) एक दिवस विश्रांतीनंतर शुक्रवापासून पाऊस वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे, तर दुसरीकडे नद्या, नाले पाण्याने भरभरून वाहत आहेत.
शेतातही पाणी
सततच्या पावसामुळे अनेक शेतातही पाणी साचले आहे. हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी चांगला आहे.
मात्र, अजून काही दिवस संततधार सुरू राहिल्यास पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कापूस, मका, बाजारी, ज्वारी पिके जोमाने वाढत आहेत.
आता उघडीपीची गरज
गेल्या जून महिन्यात पाऊस झाला नव्हता. यामुळे चांगल्या पावसाची गरज होती. आतापर्यंत ९२ टक्के पाऊस झाल्याने जुलै महिन्यात पावसाची भर निघाली आहे. आता मात्र पावसाने उघडीप देण्याची गरज आहे. पिकांची वाढ हेाण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे. शेतांमध्ये पिकांशेजारी गवत उगवले आहे. तेही काढण्याची गरज आहे. त्यासाठी पावसाची उसंत मिळणे गरजेचे आहे.
“आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी लाभदायी आहे. मात्र, आता पावसाने काही दिवस विश्रांती घेणे गरजेचे आहे. कापूस, मका, बाजरी पिकांची चांगली वाढ आहे.” -रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी












