प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील फेकरी येथे कृषि विभागातील आत्मा योजनेमार्फत स्थापित कृषि संजीवनी शेतकरी गट यांच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी गृहाचे उद्घघाटन मा. प्रकल्प संचालक आत्मा जळगांव श्री रविशंकर चलवदे यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री पांडुरंग साळवे (प्रकल्प उपसंचालक आत्मा), श्री गुलशन कुमार गौरव (बॅक मॅनेजर महाराष्ट्र बॅक, भुसावळ ) व श्री शरद बोरसे (तालुका कृषि अधिकारी भुसावळ) हे उपस्थित होते.
धान्य स्वच्छता फॅक्टरीच्या उद्घाटन भाषणात श्री चलवदे यांनी शेतक-यांनी गट व कंपनीची स्थापन करून कृषि विभागाच्या पोकरा, PMFME, AIF अशा योजनांच्या माध्यमातून विविध कृषि प्रक्रिया उद्योग सुरु करून उद्योजक व्हावे असे शेतक-यांना आवाहन केले यासाठी शासनाकडून ३५,५० व ६० टक्केच्या प्रमाणात अनुदान उपलब्ध आहे असे सुचवले.
श्री पांडुरंग साळवे यांनी शेतक-यांनी गट व कंपनी च्या एकमेकांच्या सहकार्यातून आपला सर्वांगीन विकास करण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच
श्री शरद बोरसे यांनी योजनेतून प्रक्रिया पदार्थ त्याचे पॅकेजींग व मार्केटिंग करून अधिक नफा मिळविण्याविषयी मार्गदर्शन केले. तर बॅक मॅनेजर श्री गुलशन कुमार यांनी शेतकरी गट व कंपन्यांच्या माध्यमातून प्रभावी गट संघटन व कृषि पुरक व्यवसायासाठी कर्ज सुविधा व बॅकेची नेहमी सहकार्याची भुमिका याविषयी मार्गदर्शन केले.
आपले मनोगत व आभार व्यक्त करतांना कृषि संजीवनी शेतकरी गटाचे अध्यक्ष श्री अतुल अशोक कवटे यांनी बॅक मॅनेजर श्री गौरव कुमार, आत्मा योजनेचे श्री प्रमोद जाधव, पोकरा योजनेचे श्री रमेश शिंदे आणि रोझोदकर फार्मर्स प्रोडयुसर कं. चे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले असे मत व्यक्त केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटाचे सर्व संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले.












