पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा; मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
अमळनेर, २७ ऑगस्ट : तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने टाकरखेडा गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांची दोन मुले सनी व राज हे पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडले होते. त्यानंतर चौघांचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
या घटनेची माहिती पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, तसेच विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याची कार्यवाही केली.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कारणातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलिसांच्या तपासानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. या हृदयद्रावक घटनेमुळे गावातील वातावरण अत्यंत गंभीर झाले आहे.
पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण, चौघे घरातून कधी आणि कोणत्या परिस्थितीत बाहेर पडले तसेच रेल्वे मार्गावर ते कसे पोहोचले, याबाबत तपास केला जात आहे. तपासातूनच या दुर्दैवी घटनेमागील सत्य समोर येणार आहे.












