मुंबई -अभिनेत्री कंगना रणौतने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जातोय. “कंगना रणौत या बाईची स्वातंत्र्यासारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का, हे आधी तिने तपासून पहावे,” अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले आहे. ते बुलडाण्यातील चिखली येथे बोलत होते.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, “भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता, आणि कंगना रणौत सारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे,” असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.
देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली.
मी माझ्या सोशल मीडियावर एक कलाकार म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून सक्रीय असते. मी तिथे कधीही माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाही. मी तिथे नेहमीच देशाचे मुद्दे मांडत असते,” असेही कंगनाने सांगितले. दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या वक्तव्यावरुन तिला ट्रोलही केले जात आहे.












