जळगाव : कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून लाखो नागरीक बेरोजगार झाले आहेत. अशातच शैक्षणिक क्षेत्रातून विद्यार्थी व पालकांची लूट सुरूच असून याबाबतीत राज्य सरकारने लक्ष द्यावे, यासाठी संयुक्त विद्यार्थी संघटनेतर्फे राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे खान्देश विभाग महासचिव तोषिश पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष स्वप्निल सोनवणे, जिल्हा संघटक रितेश पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.कोरोनामुळे मागील वर्षापासून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.अशात राज्यातील शाळा व महाविद्यालयांकडून आॕनलाईन लेक्चर आणि परिक्षाही आॕनलाईनच घेतली घेतली. असे असले तरी विद्यार्थी व पालकांकडून फी मात्र पूर्णपणे घेण्यात येत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी महाविद्यालयांतील अनावश्यक फी रद्द करण्याची घोषणा केली खरी मात्र ती अद्यापही अनेक विद्यापीठांत अमलात आलेली नाहीये. यामुळेच हा निर्णय लवकर अमलात आणावा व पालकांकडून महाविद्यालयांनी आधीच वसूल केलेली फी ही त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परत मिळावी. तसेच शालेय विभागातही सरकारकडून १५ % फीमाफीची घोषणा झालेली असली तरी अनेक खाजगी शाळांकडून पालकांना आधीच फी भरण्यास भाग पाडले आहे. यामुळे सदरची फी ही शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना परत मिळावी. तसेच अनेक महाविद्यालये व खाजगी शाळा पूर्ण फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना आॕनलाईन क्लासेस व शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. अशा विद्यार्थ्यांना तक्रारीसाठी एक पोर्टल तयार करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थी व पालकवर्ग मनमानी कारभार करणाऱ्या सदर महाविद्यालये तथा शाळांची थेट तक्रार करू शकतील, अशा विविध मागण्या निवेदनामार्फत संयुक्त विद्यार्थी संघटनेने केली आहे.मा.निलमताई गोर्हे यांना निवेदन तथा स्वागत करताना संयुक्त विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी












