“तेव्हा राजकरण सोडूया असं वाटलं पण…” आनंद दिघे यांच्याबाबत बोलताना भारावून गेले एकनाथ शिंदे

0
40

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्यानिमित्ताने रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचा २१ ऑगस्टला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. याचनिमित्त झी मराठी वाहिनीने एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले, “कमी वेळामध्ये कामाचा खूप मोठा डोंगर धर्मवीर आनंद दिघे यांनी उभा केला. लोकांचे प्रश्न, अडचणी दूर करणं हे त्यांचं काम होतं.”

“त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. पण योग जुळून येत नव्हता. प्रसाद ओक यांची लूक टेस्ट पाहिल्यानंतर आनंद दिघे यांच्या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्याची निवड केली आहे असं वाटलं. आता तर प्रसाद ओक यांना आनंद दिघे म्हणूनच लोक ओळखू लागले आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान जेव्हा प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या लूकमध्ये समोर आला, ते पाहून मी अचानक त्याच्या पाया पडलो.”

पुढे ते म्हणाले, “माझ्या दोन्ही मुलांचा जो दुःखद प्रसंग होता त्यामुळे मी आणि माझ संपूर्ण कुटुंब कोलमडून गेलं होतं. तेव्हा राजकरणही सोडूया असं वाटत होतं. तेव्हा दिघे साहेबांनी मला सांगितलं एकनाथ तुला फक्त आता समाजासाठी जगायचं आहे. तुझं हेच दुःख एकदिवस तुझी सगळ्यात मोठी ताकद असेल. दिघे साहेब त्या प्रसंगामध्ये माझ्या पाठिशी उभे राहिले. ‘धर्मवीर’ जेव्हा मी पाहिला तेव्हा माझ्या आयुष्यातील दुःखद प्रसंग मला पुन्हा एकदा आठवला. आज मी जे काही आहे त्यामागे दिघे साहेब यांचं प्रेम आणि आशिर्वाद आहे.” आनंद दिघे यांच्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे अगदी भारावून गेले होते.

Spread the love