मोठी बातमी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ‘राजीनामापत्र’, पंतप्रधानांकडे व्यक्त केली पदमुक्त होण्याची इच्छा

0
40

महापुरुषांबाबत वारंवार वादग्रस्त विधाने करून टीकेची धनी झालेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचे राज्यपालांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची माहिती स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस असल्याचे कोश्यारी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

‘महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,’ असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Spread the love