जळगाव : शासकीयरेशन दुकानम्हणजे धान्याचा काळाबाजार, लाभार्थ्यांचे धान्य इतरांना देणे, लाभार्थ्यांना वारंवार फेऱ्या मारायला लावणे, असा अनुभव अनेक रेशनकार्डधारकांना येतोच.
कधी रेशन दुकान वेळेवर उघडत नाही, तर कधी धान्यच संपलेले असते.
कार्डधारकांचा होणारा त्रास कमी होण्यासाठी जळगाव शहर व ग्रामीण रेशन दुकानदार संघटनेच्या रेशन दुकानदारांनी त्यांच्या दुकानावर असलेल्या कार्डधारकांचा वेगवेगळा व्हॅट्सॲप ग्रुप तयार केला आहे.
त्याद्वारे ते दुकानावर धान्य आले आहे, केव्हा येणार आहे, किती धान्य मिळेल, याची इत्यंभूत माहिती पाठवितात.
याचा रेशन कार्डधारकांना फायदा होऊन त्यांच्या रेशन दुकानावर फेऱ्या मारण्याचा त्रास कमी झाला आहे. ‘कोरोना’ च्या काळात रेशन दुकान सर्वसामान्य, गरीबांसाठी धान्य मिळण्याचे मोठे साधन होते. यामुळे रेशन दुकानावर केव्हा धान्य मिळते, याकडे कार्डधारक लक्ष ठेवून असतं. कोरोना काळात बाहेर पडता येत नसले, तरी काही वेळासाठी ते धान्य घेण्यासाठी रेशन दुकानांवर जात असे.
त्यानंतरच्या काळातही काही कार्डधारकांना रेशनसाठी दुकानांवर वारंवार फेऱ्या माराव्या लागताहेत. ही गैरसोय टाळण्यासाठी दुकान संघटनेचे उपसचिव व रेशन दुकान क्रमांक ४२/१ चे चालक हेमराज काळुंखे यांनी एक युक्ती लढवित रेशन कार्डधारकांचे दोन व्हॅट्सॲप ग्रुप तयार केले. एकूण ८३४ कार्डधारक त्यात आहेत.
त्या ग्रुपवर रेशन दुकानात आलेल्या धान्याची माहिती ते पाठवितात. यामुळे कार्डधारक अलर्ट होऊन धान्य आले, की दुकानावर जातात. त्यांचा रेशन दुकानावर वारंवार जाण्याचा फेरा वाचतो. अनेक रेशन कार्डधारक मोलमजुरी करतात, रोजंदारीने कामावर जातात. त्यांना पूर्वी रोजगार बुडवून धान्य घेण्यासाठी पूर्वी यावे लागत होते.
आता व्हॅट्सॲप ग्रुपमुळे त्याला केव्हा धान्य येणार, आले आहे याची माहिती होते. त्याचवेळी तो रेशन दुकानावर जाऊन धान्य घेतो. व्हॅट्सॲप ग्रुपचा फायदा अशाप्रकारे कार्डधारकांना होत आहे.
रेशन दुकान क्रमांक ४२/२ अशोक पांडे, ४२/३ विश्वास महांगडे, शिवकालनी राधिका जोगी, ३७/७ एफ. पठाण आदी दुकानदारांनीही श्री. काळुंखे यांच्या व्हॅट्सॲप ग्रुपसारखा ग्रुप तयार करून रेशन कार्डधारकांना धान्याचे वितरण करीत आहे.
प्रधानमंत्री धान्य योजना बंद
नव्या वर्षात प्रधानमंत्री गरीब कल्याण धान्य योजना बंद झाली आहे. आता फक्त अंत्योदय कार्डधारक, प्राधान्य कार्डधारकांना धान्य मिळत आहे. साखर फक्त अंत्योदय कार्डावरच १ किलो वीस रुपये किलो दराने मिळत आहे.











