भाजप नेते किरीट सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांचं नेक्स्ट टार्गेट शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झाले. त्यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधत 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. तसेच खोतकरांनी शेतकऱ्यांनी दिलेली 1 हजार कोटी रुपयांची जमीन देखील बळकावण्याचा प्रयत्न केला, असा देखील आरोप सोमय्यांनी केला आहे.
सोमय्या म्हणाले, ‘काल शरद पवार म्हणाले अनिल देशमुख यांच्या प्रत्येक क्षणाची शिक्षा दिली जाईल. पण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच कारागृहामध्ये टाकलं. 23 जणांची चौकशी सुरु आहे. त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत. आज मी अर्जुन खोतकर यांचं नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला. त्यांनी राज्य सरकारची 100 एकर जमीन बळकवण्याचा अर्जुन खोतकर यांचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांनी जी जमीन कारखान्यासाठी दिली आहे त्याची आज मार्केट वॅल्यू 1 हजार कोटींच्या आसपास आहे. साखर कारखाना तर कधी चालू झालाच नाही. कामगाराचे पैसेही दिले नाही. पण त्या जागेवर बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉम्पलेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या संबंधी अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारी मी ईडीपासून राज्य मंत्रालयापर्यंत दिल्या आहे.’











