एकनाथ शिंदेंचा अहिराणी स्वॅग! केली खास पद्धतीने भाषणाला सुरुवात; ‘राम राम, जय खान्देश म्हणताच…

0
34

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नंदूरबार नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली. तसेच त्यांनी राज्य सरकारच्या विकास योजनांची माहितीही दिली. राज्य सरकारने मागील तीन महिन्यांमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. नवे सरकार आल्यानंतर विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जात नाहीये, असे शिंदे म्हणाले. विशेष म्हणजे शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात खास अहिराणी भाषेतून केली. शिंदे यांनी अहिराणी भाषेतून राम राम, जय खान्देश असे उद्गार काढताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत आनंद साजरा केला. मुख्यमंत्र्यांच्या याच खास अहिराणी संबोधनाची चर्चा होत आहे.

“नंदुरबारमध्ये बऱ्याच ठिकाणी अहिराणी आणि खान्देशी भाषा बोलली जाते. राम राम, सगळे कसे आहात? तुम्ही लोक दिलदार आहात. तुम्ही मुठभर घेता आणि ढिगभर देता. जय खान्देश. सगळं ठीक आहे ना?” या आशयाचे संबोधन शिंदे यांनी अहिराणी भाषेत केले.

हे जनतेच्या मनातले सरकार आहे. २०१९ साली शिवसेना-भाजपाचे सरकार यायला हवे होते. तेच सरकार मागील तीन महिन्यांपूर्वी आलेले आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामे मंदावली होती. त्याला गती देण्याचे काम सध्याच्या सरकारकडून केले जात आहे. हे सरकार लोकांच्या भावना पूर्ण करण्याचे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ या काळात अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले. पण दुर्दैवाने करोना तसेच इतर कारणांमुळे ही कामे नंतर थांबली होती. या कामांना चालना देण्याचे काम आम्ही केले. गेल्या तीन ते चार महिन्यांत आपण मोठे निर्णय घेतले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. काही लोक बांधावर जात आहेत. ठीक आहे गेले पाहिजे. शेवटी काम तर करायलाच पाहिजे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

Spread the love