महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात वातावरण पेटले आहे. मात्र भाजपच्या नेत्यांची शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव सुरूच आहेत. भाजपने आयोजित केलेल्या कोकण महोत्सवात भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे अजब विधान केले. प्रसाद लाड यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.
या कार्यक्रमात प्रसाद लाड यांनी चुकीचे वक्तव्य केल्यानंतर उपस्थितांनी त्यांच्या ही चूक लक्षात आणून दिली. मात्र लाड यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ”शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असून त्यांचे बालपण रायगडावर गेले”, असा नवा जावई शोध लाड यांनी लावल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लाड यांचा हा व्हिडिओ ट्विट करत टीका केली आहे. ”दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराजांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे”. अशी टीका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 4, 2022











