शिवसेनेचा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, असा विश्वास खासदार नवनीत राणा यांना व्यक्त केला.
त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या. उद्धव ठाकरे यांच्या काळात फेसबुक लाईव्हवर सरकार अडीच वर्षे चाललं, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. फक्त हनुमान चालिसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला 13 दिवस या उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकलं. बाळासाहेबांचे विचारच जर त्यांच्या घरात ठेवले नाहीतर त्यांचं काय होईल? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.
धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाच मिळणार
नवनीत राणा म्हणाल्या, ” सत्तासंघर्ष सध्या सुरु आहे. सत्ताचा काय संघर्ष आहे? जे बाळासाहेबांचे विचार घरात जिवंत ठेवू शकले नाहीत, ते सत्तेसाठी काय संघर्ष करणार? मला विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यांनाच धनुष्यबाण मिळेल असा विश्वास आहे. माझा देवावरचा विश्वास, हनुमान चालिसावर विश्वास आहे. बाळासाहेबांना मानणारे ज्यांच्याजवळ आहे, त्या एकनाथ शिंदेंना पुढच्या निवडणुकीत धनुष्यबाण मिळेल आणि त्या चिन्हावर ते आपले उमेदवार मैदानात उतरवतील, हा मला विश्वास आहे”
अमरावतीला टेक्स्टाईल इंडस्ट्री येणार
टेक्स्टाईल पार्क विदर्भात आला पाहिजे यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. अखेर देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि कालच त्यांनी सांगितले की तो टेक्स्टाईल पार्क अमरावतीलाच येईल, असा दावा नवनीत राणा यांनी केला.
मुलींना सरकारी नवरा पाहिजे
या देशाला जर कोणी वर आणलं असेल तर तो आहे आमचा शेतकरी. कोरोना काळातही फक्त शेतकरी होता जो आपल्याला उपाशी राहू दिलं नाही. मुलीकडे डिग्री असली आणि तिला विचारलं तर ती सांगते सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे किंवा मोठ्या कंपनीत जॉबवाला तरी पाहिजे. पण शेतकरी नको. शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको ही भावना मुलींच्या मनात निर्माण झाली आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
शेतीला कुंपण, लवकरच नवी योजना
शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा त्रास आहे ते जनावरांचा. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान होते. जर नाही झालं तर शेतात जनावर येऊन पीक नष्ट करुन जातात. या मुद्द्याबाबत केंद्रीय कृषीमंत्र्यासोबत चर्चा झाली असून आता यावर केंद्राची योजना येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला कुंपण लावण्यात येईल. यावर काम सुरु असून लवकरच योजना राबवण्यात येणार आहे, असा दावा नवनीत राणा यांनी केला.











