अखाद्य तुपाची निर्मिती आणि विक्री केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह अटकेतील सर्वांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अखाद्य तुपाची निर्मीती करण्याकामी अन्न व औषध प्रशासनाची कुठलीही परवानगी नसतांना दूध संघात अखाद्य तुपाची निर्मीती आणि विक्री झाली आहे. खाण्यास अयोग्य असलेले तुप तयार करुन त्याची विक्री झाल्याचे आजवरच्या पोलिस तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यातील सर्व धागेदोरे पोलिस तपासणार असल्याचे म्हटले जात आहे.
जळगाव शहरातील विठ्ठल रुख्मिनी एजन्सीला किरकोळ विक्रीचे लायसन असतांना देखील त्यांना मोठ्या प्रमाणात होलसेल दरात अखाद्य तुपाची विक्री झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. जनतेच्या जिवाशी सुरु असलेला खेळ पोलिस तपासातून उघड झाला आहे.
विठ्ठल रुख्मिनी एजन्सीचे हरी रामु पाटील यांनी हे अखाद्य तुप अकोला येथील रवी अग्रवाल यांच्या मे.कैलादेवी कुटीर उद्योग या संस्थेस विक्री केल्याचे देखील उघड झाले आहे. रवी अग्रवाल यांनी या अखाद्य तुपापासून चॉकलेटची निर्मीती करुन बालकांच्या जिवीताशी खेळ केला आहे. या तुप खरेदी विक्रीची बिले दिली वा घेतली नसल्याचे देखील उघड होत आहे. मात्र बॅंक खात्याच्या माध्यमातून हा व्यवहार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात अटक झालेल्या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून पोलिस पाळेमुळे खणून काढत आहेत.











