गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळवून भाजपने सलग सातव्यांदा सत्तेवर येऊन इतिहास रचला आहे. दरम्यान,गुजरात निकालानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरात राज्यात सलग 27 वर्ष सत्ता ठेवून सुद्धा बहुमताने या ठिकाणी जागा येत आहेत. याचाच अर्थ जनतेशी नातं आणि तेथे झालेल्या विकास कामांमुळे जनता त्यांच्या पाठीशी राहते. हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिले आहे; अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गुजरात राज्यातील निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून यात भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निकालानंतर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की एक्झिट पोलमध्ये सुद्धा भाजप सर्वात मोठी पार्टी असेल असे हे सगळे चित्र दिसत होते. ही देशाची निवडणूक ही याकरता चुरशीची होती. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये राहतात.
साहजिक आहे, की पंतप्रधान मोदी यांनी त्यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना केलेली कामे आणि टिकवून ठेवलेला राज्याशी नात, त्याचबरोबर तिथे असलेले संघटन यातूनच त्यांना जो बहुमताचा कौल मिळत आहे. त्यातूनच असे वाटतं की महाविकास आघाडी जी महाराष्ट्रमध्ये आहे. त्यांनी या गोष्टीचा बोध घेण्याची अत्यावश्यक गरज आहे.











